[go: nahoru, domu]

Jump to content

मुहम्मद युनूस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डॉ. महंमद युनूस (२८ जून, इ.स. १९४०:चट्टग्राम, बांगलादेश - ) हे बांगलादेशातील ग्रामीण बँकेचे संस्थापक आहेत. सन २००६ मध्ये त्यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. महंमद युनूस हे बँकर टू द पुअर या ग्रंथाचे लेखक आहेत.

आईवडिलांच्या नऊ अपत्यापैकी तिसरे अपत्य असलेल्या युनुस ह्यांनी अर्थशास्त्र ह्या विषयात ढाका विद्यापीठातून बी.ए.आणि एम.ए.केले.काही वर्षे ढाका विद्यापीठात अध्यापन केले.फुलब्राईट शिष्यवृत्तीद्वारे व्हंडरबिल्ट युनिव्हर्सिटीतून पीएच.डी.केली. काही काळ तिथे अद्यापन केले.साल १९७२ मध्ये ते चितगाव विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख झाले.[]

ऑगस्ट २०२४मध्ये बांगलादेशमध्ये झालेल्या आंदोलनामुळे पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतात पळ काढल्यावर युनूस यांनी मुख्य सल्लागार या नात्याने देशाचा कारभार पाहिला.

आर्थिक विचार

[संपादन]

महंमद युनूस यांनी ग्रामीण बँकेबाबत केलेले कार्य फार महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या मते, गरिबांना छोट्या छोट्या रकमेची कर्जे देणे आवश्यक आहे. बँकेकडे पुरेशा प्रमाणात तारण न देऊ शकणाऱ्या गरिबांना मदत केली पाहिजे. गरीब व छोटे कर्जदारही वेळेत कर्जाची परतफेड करू शकतात. पण त्यांना योग्य संधी दिली गेली पाहिजे असे मत त्यांनी मांडले. अल्प उत्पन्न गटातील व्यक्तींना वित्तपुरवठा करण्यासाठी सूक्ष्म वित्त व्यवस्था विकसित केली पाहिजे. उपभोक्ते, स्वयंरोजगारातील व्यक्ती, छोटे व्यावसायिक इत्यादींना बँकिंग क्षेत्राकडून पुरेशा सेवा उपलब्ध होत नाहीत. त्यांना कर्जपुरवठ्यासोबत बचत, विमा आणि निधीत्चे हस्तांतरण इत्यादी सुविधाही उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी त्यांनी गरीब व सामान्य व्यक्तींना सुलभतेने सुक्ष्म वित्तपुरवठा उपलब्ध करण्याची सूचना केली.

खुल्या बाजारव्यवस्थेबाबतही त्यांनी आपले विचार मांडले. महंमद युनूस यांच्या मते, प्रचलित खुली बाजारव्यवस्था समाजातील सर्व समस्यांवर तोडगा काढू शकत नाही. विद्यमान स्थितीत गरिबांना आर्थिक विकास साधण्याची संधी, आरोग्याच्या सेवा, शैक्षणिक सेवा, निराधार व दिव्यांगांची सोय इत्यादीची कमतरता आहे. म्हणून त्यांनी न्याय, शांतता व सुव्यवस्था, देशाचे संरक्षण कार्य आणि विदेशी धोरण या बाबींवर सरकारने आपले अधिक लक्ष केंद्रित करण्याविषयी आपले मत मांडले. तसेच इतर सर्व जबाबदाऱ्या ग्रामीण बँकेसारख्या सामाजिक जाणीवेने कार्य करणाऱ्या खाजगी क्षेत्रावर सोपविले पाहिजे.

देशाचा आर्थिक विकास होताना त्याचा लाभ सर्व घटकांना समानतेने होईलच असे नाही. करण सर्व आर्थिक स्तरातील घटक समान वेगाने वाटचाल करीत नाहीत. आर्थिक वृद्धीशिवाय गती नसल्याचेही ते मान्य करतात. आर्थिक वृद्धीला प्रोत्साहन देण्यासाठी रस्तेबांधणी, ऊर्जानिर्मिती प्रकल्प, विमानतळ इत्यादीमध्ये पुरेश्या प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक आहे. अल्प पतपुरवठ्याच्या सहाय्याने आधारभूत संरचना निर्माण करता येईल. वंचित समाजाचे आर्थिक इंजिन याद्वारे सुरू करता येईल. अशी छोटी छोटी इंजिने सुरू करून आर्थिक विकास गतिमान करता येईल. 

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४

ए. आर. रायखेलकर आणि बी. एच. दामजी, आर्थिक विचारांचा इतिहास, (मराठी) विद्या बुक्स पब्लिशर्स, औरंगाबाद, जुन, २०११, आय. एस. बी. एन. ९७८-९३-८१३-७४-१०-८